Latest Posts

ई-केवायसी करा, अन्यथा रेशनकार्ड होणार रद्द : अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / सातारा (Satara) : राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब गरजूंना रेशनधान्‍य पुरवठा केला जातो.

त्‍या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना सरकारने ई-केवायसीची अट घातली आहे. योजनेतील बनावट लाभार्थ्‍यांचा शोध ई-केवायसी तून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्‍यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. ई- केवायसी न केलेल्‍यांचे रेशनधान्‍य, तसेच रेशनकार्ड १ नोव्‍हेंबरपासून बंद होणार आहे.

राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजनेंतर्गत स्‍वस्‍तातील धान्‍य मिळविण्‍यासाठी सर्व रेशनकार्डधारकांना ई-केवायसी चे बंधन घा‍तले आहे. अन्‍न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. मात्र, तरीही अनेक शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ई-केवायसी करण्‍यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्‍यात आली आहे.

जर शिधापत्रिकाधारकांने ३१ ऑक्‍टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्‍यांना रेशनधान्‍य मिळणार नाही. याशिवाय आशा शिधापत्रिकाधारकांची नावेही रेशनकार्डमधून वगळली जाणार असून, त्‍या शिधापत्रिकादेखील रद्द केल्‍या जाणार आहेत. शिधापत्रिकेत नावे असलेल्‍या प्रत्‍येक लाभार्थ्‍यांने आपल्‍या क्षेत्रातील स्‍वस्‍त धान्‍य दुकानात जाऊन तेथे उपलब्‍ध करून दिलेल्‍या ई-पॉस डिजिटल यंत्रामध्‍ये आधार क्रमांक सीडिंग करून घ्‍यायचा आहे. अवघ्‍या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून, ई-केवायसी पूर्ण झाल्‍यावरच येत्‍या काळात लाभार्थ्‍यांच्‍या नावाने धान्‍य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे.

स्थलांतरित कुटुंबांनादेखील ते वास्‍तव्‍य करत असलेल्‍या क्षेत्रातील स्‍वस्‍त धान्‍य दुकानात जाऊन ई-केवायसी पडताळणी पूर्ण करता येणार आहे. ई-केवायसी अपटेड करण्‍यामागे धान्‍य वितरणात पारदर्शकता आणणे हा उद्देश असल्‍याचे सांगण्‍यात आले.

लाभार्थी तेच आहेत हे कळावे, बनावट लाभार्थी असल्यास ते सापडावेत, यासाठी शिधापत्रिकांना केवायसी आवश्यक आहे. धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी जिल्ह्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम राबविली जात आहे. शिधापत्रिकाधारकांना केवायसी करणे बंधनकारक आहे.

Latest Posts

Don't Miss