Latest Posts

उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या विषयावर खासदार अशोक नेते यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट : लवकरच समस्येवर तोडगा काढणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला दिवसा १२ तास वीज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी देसाईगंजमध्ये शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. दरम्यान आज सोमवारी ४ मार्च ला खासदार अशोक नेते यांनी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली. शेतकऱ्यांची ही समस्या तातडीने दूर करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलावे असे मत खासदार अशोक नेते यांनी केले. त्यावर ना. फडणवीस यांनी १२ तास वीज पुरवठा करण्यात काही तांत्रिक अडचण येत आहे. पण यावर लवकरच तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही खा. नेते यांना दिली.

गेल्या २६ फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांचे हे उपोषण सुरू आहे. या उपोषणाला खा.अशोक नेते, यांनीही प्रत्यक्ष भेट दिली आहे. पण समस्या सुटल्याशिवाय उपोषण मागे घेण्यास शेतकरी तयार नाहीत. बेमुदत उपोषण करत असलेले कोरेगांवचे शेतकरी श्याम मस्के यांची प्रकृती ढासळली आहे. तर इतर शेतकरी साखळी उपोषण करत आहेत. शेतकऱ्यांची समस्या लवकर दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असल्याचे खा. नेते यांनी उपोषणकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितले होते.

ना. देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना निर्देश देऊन ही समस्या लवकरच सोडविली जाईल असे मत व्यक्त केले. या संबंधित यावेळी निवेदन सुद्धा देण्यात आले.

याप्रसंगी निवेदन देतांना खासदार अशोक नेते यांच्यासह आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष अविनाश पाल, तालुकाध्यक्ष सुनिल पारधी, वसंता दोनाडकर, बंगाली आघाडीचे नेते सुरेश शहा, गायकवाड जी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss