– योजनादूताना दहा हजार रुपये मानधन
– मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीत एक याप्रमाणे ५२१ आणि शहरी भागात ५ हजार लोकसंख्येमागे एका योजनादूताची निवड होणार आहे. वर्धा जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात असे एकूण ६७३ योजनादूत नेमल्या जाणार आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ईच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी ३ सप्टेंबर पर्यंत नोंदणी आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.
या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. नगरपालिकासह नगरपंचायतीत पाच हजार लोकसंख्येमागे एक योजनादूत नेमला जाणार आहे.
ग्रामीण भागात निवडल्या जाणाऱ्या योजनादूतांची तालुकानिहाय संख्या –
आर्वी ७३, आष्टी ४१, कारंजा ५९, देवळी ६३, समुद्रपूर ७१, सेलू ६२, वर्धा ७६ व हिंगणघाट ७६ असे एकुण जिल्ह्यातील ग्रामीण भागात ग्राम पंचायतीत योजनादूतांची नेमणुक करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.