विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / छत्तीसगड (Chhattisgad) : छत्तीसगडच्या बीजापुरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज चकमक उडाली आहे. यामध्ये सुरक्षा दलांना दोन महिलांसह सहा नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात यश आले. सुरक्षा दलाच्या कोब्रा २१०, २०५, सीआरपीएफ २२९ बटालियन आणि डीआरजीच्या संयुक्त अभियाना दरम्यान ही कारवाई केली.
एसपी जितेंद्र कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
माहितीनुसार, छत्तीसगढच्या बिजापुर जिल्ह्यातील बासागुडा परिसरात होळीच्या दिवशी अज्ञातांनी गावात घुसून तीन ग्रामीणांची कुऱ्हाडीने हल्ला करुन निर्घृणपणे हत्या केली. ज्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या एकाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता ही हत्या नक्षलवाद्यांनी केल्याचे म्हंटले जात होते. पोलिसांचे खबरी असल्याचा संशयावरुन ग्रामस्थांची हत्या केली होती. यामध्ये चंद्राया मोडियम, अशोक भंडारी आणि कारम रमेश अशी त्यांची नावे आहेत. सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक घडली. चकमकीनंतर केलेल्या शोधमोहिमेत ६ जणांचे मृतदेह सापडले त्यात दोन महिलांचा समावेश आहे. घटनास्थळावरुन शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.